कफातून तमोगुण, वायूतून रजोगुण आणि पित्तातून सत्त्वगुण निर्माण होतो. समप्रकृती सर्वश्रेष्ठ असते. शरीरातील धातू सम प्रमाणात असतील, तर ती समप्रकृती समजावी. समप्रकृती असणारा मनुष्य कधी कोणाचा द्वेष करीत नाही, चोरी करीत नाही. कोणावर रागावत नाही, कधी खोटे बोलत नाही व कधी गर्वही करीत नाही. सारांश, तो दैवी गुणांनी युक्त असतो. शरीरातील धातूंचे सम प्रमाण हे आरोग्य व धातूंचे विषम प्रमाण हा रोग होय. वात, पित्त, आणि कफ या त्रिदोषांमुळेच शरीरात रोग उत्पन्न होतात. या तिन्ही दोषांचे सम प्रमाण मनुष्याला निरोगी जीवन देते, तर त्यांचे विषम प्रमाण मानवी शरीरात रोगाचा प्रादुर्भाव उत्पन्न करते.
शरीराचे नुकसान करणाऱ्या आहाराने या दोषांचा प्रकोप होऊन रोग उत्पन्न होतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि वीर्य (शुक्र) हे मानवी शरीरातील सात धातू आहेत. यांपैकी जो धातू कमी होईल तो वाढेल अशा आहाराचा तुम्ही उपयोग केला पाहिज. शरीरातील रसधातू कमी झाला असेल तर दूध प्या. रक्त कमी झाले असेल तर मिरे घालून धारोष्ण दूध घ्या. मांस कमी झाले असल्यास दूध व तूप खा. मेद कमी झाला असल्यास लोणी खा, इत्यादी. शरीरात वात, पित्त आणि कफ यांचे प्रमाण वाढले तर वृद्धीचा दोष निर्माण होतो व घटले, तर हासाचा दोष निर्माण होतो. यास्तव वृद्धीचा दोष निर्माण झाला की तो कमी करण्याचा प्रयत्न करावा आणि हासाचा दोष निर्माण झाला की ते प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करावा. याप्रमाणे शरीरात वात, पित्त आणि कफाची समानता टिकवून ठेवता येईल. वात (वायू) हा शीत, हलका, सूक्ष्म, चलायमान, खडबडीत व रुक्ष असतो. या गुणांच्या विरोधी गुण असणारा आहार घेतल्याने विकृत वायूचे शमन होते. जसे एरंडेल तेल, लसूण, इत्यादी. पित्त हे चिकट, गरम, प्रवाही आंबट आणि तिखट असते . या गुणांच्या विरुद्ध गुण असणारा आहार घेतल्याने बिघडलेल्या पित्ताचे शमन होते. उदा. गाईचे तूप. कफ हा अतिशय थंड, मृदू, स्निग्ध, मधुर, स्थिर व चिकत असतो. या गुणांच्या विरोधी गुण असणारा आहार घेतल्याने कफाचे शमन होते. उदा. सुंठ, मधुर, आंबट, खारट, कडू, तुरट व तिखट हे सहा रस आहेत.
कोणत्याही आहारात किंवा पेयात या सहा रसांपैकीच काही रस असतात. मात्र या सहा रसांचे गुण, वीर्य, विपाक व प्रभाव यांची माहिती करून घेतल्याने व त्याप्रमाणे आचरण केल्यानेच सर्व रोग दूर होतात. वायूचा दोष वाढला तर गोड, आंबट आणि खारट रस असणारा आहार घ्यावा. पित्ताचा दोष वाढला तर कडू, तुरट व गोड रस असणारा आहार घ्यावा. तसेच कफदोष वाढला तर तुरद तिखट व कडू रस असणारा आहार घ्यावा म्हणजे वाढलेल्या दोषांचे शमन होते.
वायू, पित्त, कफ, वातपित्त, पित्तकफ, कफवात व समप्रकृती अशा सात प्रकारच्या बदलणे फार कठीण गोष्ट आहे; परंतु ती हळूहळू बदलता येणे शक्य आहे. मात्र त्यासाठी मनुष्याच्या प्रकृती असतात. प्रत्येक माणसाची प्रकृती वेगळी असते. निसर्गदत्त प्रकृती भगीरथ प्रयत्न करावे लागतात. प्रकृती बदल्याच्या कामी आहार फार मोठे कार्य करीत असतो. तुम्हांला जर समप्रकृती बनवायची असेल तर स्वास्थ्यविषयक नियमांचे पालन केले पाहिजे. दोषसंचय झाला असेल तर शोधनाने तो दूर केला पाहिजे. वात, पित्त, किंवा कफ वाढणार नाही या गोष्टींची नेहमी काळजी घेतली पाहिजे. वायू वाढला तर बस्तीचा उपयोग करावा. पित्त वाढेल तर विरेचन घ्यावे व कफ वाढला तर उलटी करावी.
प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार पोषक आहार घ्यावा. समतोल व पोषक आहाराच्या मुख्य घटकांत नत्रज (प्रोटीन), शर्करा (स्टार्च), चरबी (फॅट), जीवनसत्त्वे (व्हिटेमिन्स) व पाणी या गोष्टींचा समावेश होतो. प्रत्येकाने स्वतःला आवश्यक असणाऱ्या आहारापेक्षा दहा टक्के कमी आहार घेतला पाहिजे. स्वच्छ पाणी, ताक किंवा दूधही घेणे आवश्यक असते. त्या त्या ऋतूत होणारी फळेही यथाशक्ती खाल्ली पाहिजेत. प्रत्येक ऋतूचे हवामान वेगवेगळे असल्याने शरीरावर त्याचा वेगवेगळा परिणाम होतो. यास्तव आहारातही आवश्यकतेप्रमाणे फेरबदल केले पाहिजेत. तसे केल्याने त्या त्या ऋतूत शरीराची प्रतिकार करण्याची ताकद टिकून राहते. थंडीमध्ये जठराग्नी प्रदीप्त होत असतो. यास्तव आहारात मधुर व स्निग्ध पदार्थ घेतले पाहिजेत. शक्तीचा संचय करण्यासाठी थंडीमध्ये दूध, तूप आणि पाक (रसायने) अधिक प्रमाणात घेतले पाहिजेत. आवळे, बोरे, ऊस, टोमॅटो, वांगी, मुळ्याच्या शेंगा, पालकाची भाजी व फळे यांचे भरपूर सेवन केले म्हणजे शरीर धष्टपुष्ट व उत्साही राहते.
उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर तापाने हवेत अधिक उष्णता निर्माण होत असते. त्यामुळे शरीरात साठलेला कफ पातळ होऊ लागतो. यास्तव फाल्गुन महिन्याच्या सुरुवातीपासूनच लाह्या, चणे, कोरडी पोळी किंवा भाकरी असा रुक्ष आहार घेतला पाहिजे. उन्हाळ्यात पित्त विदग्ध झाल्याने जठराग्नी मंद झालेला असतो. त्यामुळे भूक कमी लागते, आहार पचणे सहजशक्य नसते. त्यामुळे जुलाब, उलटी यांसारखे रोग उद्भवतात. अशा वेळी आहार कमी घ्यावा व लिंबू, ताक, दहीं, कच्ची कैरी यांचे सेवन करावे. गूळ घालून सरबत घ्यावे. यामुळे तब्बेत चांगली राहते, शरीरातील उत्साह टिकून राहतो व दैनंदिन कार्ये चांगल्या प्रकारे पार पाडता येतात.
पावसाळ्यात पावसामुळे शरीरात वायूचा प्रकोप वाढतो. पावसाच्या पाण्यात खनिज द्रव्ये विरघळलेली असल्याने व हवेत ओलसरपणा (दमटपणा) असल्याने जठराग्नी मंद पडतो. आहार नीट पचत नाही व त्यामुळे वरचेवर आजारपण येते. ते टाळण्यासाठी चातुर्मासाचे चार महिने एकदाच जेवावे व साधा आहार घ्यावा. तसेच नियमितपणे आंबट-गोड फळांचा, लिंबाचा व आल्याचा रस घ्यावा. वसंत ऋतूतील तापाने शरीरात साठलेला कफ पातळ होऊन जातो. त्यामुळे खोकला, सर्दीचा ताप इत्यादी कफविकार होतात. वर्षा ऋतूत जुलाब, उलटी, वायूचा ताप इत्यादी वायुरोग होतात. शरद ऋतूत आकाश निरभ्र असल्याने प्रखर ऊन पडते. त्यामुळे पित्तप्रकोप होतो व त्यामुळे पित्ताचा ताप, उलटी वगैरे पित्ताचे रोग होतात. भाद्रपद व आषाढ या दोन महिन्यांत पुष्कळ लोक विशेषतः मलेरियाने आजारी पडतात. तसेच ढगाळ हवा व दमट वातावरण यांमुळे सर्दी, ताप व कावीळ हे रोग उद्भवतात. यास्तव शरद ऋतूत हलका व साधा आहार घ्यावा. त्याबरोबर दूधपाक किंवा खिरीसारखे दुधाचे पदार्थ अधिक प्रमाणात घ्यावेत. ताक, दहीं बिल्कुल घेऊ नये.
पावसाळ्याचे चार महिने दररोज अडीच-तीन ग्रॅम महासुदर्शन चूर्ण घेतल्याने कसलाच विकार होत नाही आणि कोणत्याही औषधाची किंवा डॉक्टरची जरूर भासत नाही. जेवण्यापूर्वी हात, पाय व तोंड स्वच्छ धुऊन जेवायला बसावे. प्रसन्नचित्ताने, हळूहळू व खूप चावून अन्न खावे. जेवताना वृथा घाई करू नये. अन्न जिभेला स्वादिष्ट लागले म्हणून पोट ठासून भरेपर्यंत जेवू नये. तळलेला, मसालेदार व पचण्यास जड आहार स्वादिष्ट लागला तरी फार घेऊ नये. भूक लागली नसेल, तर कधीही जेवू नये. रात्री साधे व हलके भोजन घ्यावे. सातू, ज्वारी, थंड व रुक्ष पदार्थ हे वायुकारक असतात. बाजरी, तेल व गरम पदार्थ पित्तकारक असतात. गहू, नवीन तांदूळ, तूप व चिकट पदार्थ कफ निर्माण करणारे असतात. प्रत्येकाने आपली प्रकृती कशा प्रकारची आहे हे ओळखून तिला बाधक असा आहार घेतला पाहिजे. तसेच विरुद्ध आहार घेणेही टाळले पाहिजे विरुद्ध आहारामुळे भयंकर रोग उत्पन्न होतात. उदा. फळांबरोबर दूध घेऊ नये. फळांबरोबर दूध घेणे हा विरुद्ध आहार आहे. लसूण व कांद्याबरोबर गूळ किंवा दूध घेऊ नये. हाही एक विरुद्ध आहार आहे. रोग झाल्यावर ते बरे करण्याची खटपट करण्यापेक्षा ते होऊच न देण्याची काळजी घेणे केव्हाही श्रेयस्कर !
‘ पथ्य पाळणाऱ्याचा रोग, औषधाशिवाय बरा होतो; पण पथ्य न पाळणाऱ्याचा रोग शेकडो औषधांनीही बरा होत नाही,’ हे अगदी खरे आहे….
खूप उपयुक्य माहिती